![]() |
| महावितरण |
प्रति
व्यवस्थापकीय संचालक , महावितरण
विषय : वीज मीटर्सचा दुष्काळ कधी संपणार ?
महोदय ,
गेली जवळपास दहा वर्षे महावितरणकडे वीज मीटर्सचा दुष्काळ आहे. हा दुष्काळ फक्त थ्री फेज मीटर्सचाच नाही तर अगदी घरगुती सिंगल फेज मीटर्सही उपलब्ध नसतात. यावर प्रसारमाध्यमांनी आरडाओरडा केला की थोडा काळ मीटर्स उपलब्ध होतात , परत ये रे माझ्या मागल्या सुरु. नवीन कनेक्शन साठी सोडाच नादुरुस्त मीटर्स बदलण्यासाठी सुध्दा मीटर्स उपलब्ध नसतात हे दुर्दैव आहे , मग कायदा धाब्यावर बसवून महिनोन्महिने ग्राहकांना सरासरी बिलं दिली जातात हा अनुभव आहे. राज्यात महावितरण कंपनीला सर्वात जास्त महसूल मिळवून देणार्या पुणे परीमंडळातसुध्दा मीटर्सचं दुर्भिक्ष असेल तर उर्वरीत महाराष्ट्रातील ग्राहकांची काय हालत असेल ?
सोबत एका ग्राहकाचे बिल जोडत आहे , ज्याला जानेवारी २०२१ पासून मीटर रीडिंग न घेता सरासरी १०० युनिट्सचं बिल दिलं जातं आहे. सदरहू ग्राहकाने गेल्या महिन्यात माझ्याकडे ही तक्रार सांगितल्यावर मी संबंधित कार्यकारी अभियंता यांच्याकडे ही तक्रार पाठवली. त्यानंतर आपल्या लोकांनी जागेवर जाऊन परिस्थिती पाहिली आणि मीटर फाॅल्टी असून तो बदलावा लागेल असे सांगितले . परत या महिन्यात सदरहू ग्राहकाला रिडींग न घेता सरासरी बिल दिलं आहे. त्यावर चौकशी करता मीटर्सचा तुटवडा असल्याने मीटर बदलता आलेला नाही असे सांगितले गेले.
आता इथे अनेक प्रश्न उभे राहतात . फाॅल्टी मीटर न बदलता महिनोन्महिने सरासरी वीजबिल दिल्याने महावितरणचे नुकसान झाले तर त्याला कोण जबाबदार ? नवीन कनेक्शन साठी वीज मीटर उपलब्ध नसतील तर ग्राहकांना पदरमोड करून स्वतःच्या खर्चाने मीटर्स आणावे लागतात वरून ते महावितरण कडून टेस्टींग करून घेण्यासाठी टेस्टींग फी सुध्दा भरावी लागते. हा नाहक भुर्दंड ग्राहकांनी का सोसावा ? वीज मीटर्स खरेदी करणं हे महावितरणचं काम असूनही वर्षानुवर्षे पुरेसे मीटर्स खरेदी न करण्यामागची नक्की कारणं काय आणि याला जबाबदार कोण ?
आपणांस विनंती आहे की आपण या विषयांत तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना करावी जेणेकरून भविष्यात परत संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही मीटर्सचा तुटवडा भासू नये.
आपल्या सक्रीय सहकार्याच्या प्रतिक्षेत
------- विवेक वेलणकर ,अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे
